सागर पाटील/उप संपादक-दक्ष पोलीस वार्ता न्यूज,नाशिक

नाशिक सापुतारा महामार्गावर कार वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. वणी येथील चौसाळे फाटा नजीक झालेल्या भीषण अपघातात कार चालकासह तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघात इतका भीषण होता की कार अनियंत्रित होऊन जेव्हा रस्त्याच्या बाजूच्या शेतात गेली तेव्हा कार दोन ते तीन वेळा हवेत ५ ते १० फुट वर उडाली. अपघात झाल्यानंतर परिसरात मोठा आवाज झाला. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी अपघात स्थळी धाव घेत पोलिसांना पाचारण केले. कार मधील तिघांना वणी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले. तर एका जखमीला उपचारासाठी नाशिकला हलवले आहे. मृतांमध्ये दोघा तरुणींचा व एक तरुणाचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक सापुतारा महामार्गावरून नाशिकचे दोघे तरुण व दोन तरुणी सापुतारा या पर्यटनस्थळी आपल्या एम एच -१२, एच झेड -४१६१ क्रमांकाच्या कार मधून फिरायला जात होते. अंजली राकेश सिंग (वय २३ रा. सातपूर) नोमान हाजीफुल्ला चौधरी (वय २१ रा. सातपूर अंबड लिंकरोड) सृष्टी नरेश भगत (वय २२ रा. रामबाज स्क्वेअर, नागपूर) व अजय गौतम (वय २० रा. सातपूर लिंक रोड) हे चौघे सदर कारने प्रवास करत होते. वणी येथील चौसाळे फाटा शिवारात कार वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या विरुद्ध दिशेला रस्त्याच्या बाजूला असलेल्या मोठ्या खड्ड्यात जाऊन परत थेट पुढे असलेल्या एका कांद्याच्या चाळीजवळ किमान ५ ते १० फुट हवेत उडून खाली कोसळली. अपघात इतका भीषण होता की प्रत्यक्षदर्शीनी सांगितल्या नुसार आपघाताचा आवाज तब्बल पाचशे मीटर लांब पर्यन्त ऐकू आला. दरम्यान, घटना घडल्यानंतर तात्काळ स्थानिक नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेत. जखमींना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. तसेच पोलिसांना पाचारण करून कार मधील चौघा जखमींना वणीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. यातील अंजली राकेश सिंग, नोमान हाजीफुल्ला चौधरी, सृष्टी नरेश भगत तिघांना त्याठिकाणी मृत घोषित करण्यात आले. अपघातात एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमी अजय गौतम याने बेशुद्ध होण्यापूर्वी चौघेही नाशिक शहरातील सातपूर परिसरातील शिवाजी नगर येथील रहिवासी असल्याचे सांगितले. तसेच पर्यटनासाठी जात असल्याचे सांगितले.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलीस वार्ता
संपर्क :- 98221 17037 / 98228 17037

